विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढवली रंगत
पिंगळसई : पिंगळसई केंद्राचा बालमेळावा मालसई येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला.बालआनंद मेळाव्याचे उध्दघाटनासाठी रोहा गटशिक्षणाधिकारी बांगारे , केंद्रप्रमुख घनश्याम म्हात्रे, सरपंच भारती कोल्हटकर , उपसरपंच सुनील मोहिते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर चाळके, तंटामुक्त अध्यक्ष भाऊ चाळके,नारायण मालुसरे ,लीलाधर मालुसरे, संतोष मालुसरे, संजय मालुसरे ,रविना मालुसरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयुष सुधीर चाळके यांनी भूषविले. उद्धघाटन प्रसंगी केंद्रप्रमुख घनश्याम म्हात्रे यांनी प्रास्ताविकातून बालआनंद मेळाव्याचे महत्त्व विषद केले. उपसरपंच सुनील मोहिते यांनी विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले. जिव्हाळा चॕरिटेबल ट्रस्ट च्या ट्रस्टी रविना मालुसरे यांनी रानमोडी ह्या वनस्पती बद्दल माहिती दिली व तिच्या नियंत्रणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती सांगितली, गटशिक्षणाधिकारी बांगारे साहेब यांनी बाल मेळाव्याच्या सुयोग्य नियोजनाबद्दल केंद्रप्रमुख व मालसई मुख्याध्यापकांचे कौतुक केले. बालमेळाव्याचे विद्यार्थी अध्यक्ष कुमार आयुष चाळके यांनी बालपणासारखा सुवर्णक्षण कोणताच नाही हे विषद करताना मोठ्या माणसांना त्यांच्या लहानपणीच्या आठवणी दाटून आल्या. उद्धघाटन कार्यक्रमानंतर केंद्रातील सर्व शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.ओरिगामी म्हणजेच कागदापासून विविध वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमासाठी केंद्रातील सर्व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना गव्हाणे यांनी केले तर मुख्याध्यापिका पुष्पलता शिंदे यांनी आभार मानले.
727 total views, 1 views today